देशातील तीन-चतुर्थांश लोकसंख्येला वाढत्या उष्णतेचा धोका   

देशातील सुमारे ५७ टक्के जिल्हे सध्या उष्ण ते अति उष्णतेच्या स्थितीत

नवी दिल्ली : भारतातील वाढणार्‍या तीव्र उष्णतेबाबत एक नवीन अभ्यास समोर आला आहे. या नवीन अभ्यासानुसार, देशातील सुमारे ५७ टक्के जिल्हे सध्या उष्ण ते अति उष्णतेच्या स्थितीत आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ७६ टक्के लोक या जिल्ह्यांमध्ये राहतात.
 
दिल्लीतील क्लायमेट अँड एनर्जी थिंक-टँक कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरने (सीईईडब्ल्यू) मंगळवारी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सर्वाधिक उष्णतेचा धोका असलेली १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.
 
गेल्या दशकात अतिशय उष्ण दिवसांपेक्षा अतिशय उष्ण रात्रींची संख्याही वेगाने वाढली आहे, असेही या अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासात, सीईईडब्ल्यूच्या संशोधकांनी उष्णतेच्या ट्रेंड, जमिनीचा वापर, जलसाठे आणि हिरवळी खालील भाग यांचा अभ्यास करण्यासाठी ४० वर्षांच्या हवामान डेटा (१९८२-२०२२) आणि उपग्रह प्रतिमांचा वापर करून ७३४ जिल्ह्यांसाठी उष्णता जोखीम निर्देशांक विकसित केला.

४१७ जिल्हे उष्ण आणि अति उष्ण श्रेणीत

उष्णतेच्या धोक्याचे व्यापक चित्र देण्यासाठी त्यांनी लोकसंख्या, इमारती, आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक घटक तसेच रात्रीचे तापमान आणि आर्द्रता यांचा डेटाचा समावेश केला. सीईईडब्ल्यूचे वरिष्ठ कार्यक्रम प्रमुख विश्वास चितळे म्हणाले, आमच्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की देशातील ७३४ जिल्ह्यांपैकी ४१७ जिल्हे उष्ण आणि अति उष्ण श्रेणींमध्ये येतात. त्यापैकी १५१ उष्ण आणि २६६ अति उष्ण श्रेणीत मोडतात. एकूण २०१ जिल्हे मध्यम श्रेणीत आणि ११६ कमी किंवा अत्यंत कमी श्रेणीत येतात, असे सीईईडब्ल्यूने म्हटले आहे.
 
चितळे म्हणाले, याचा अर्थ असा नाही, की हे जिल्हे उष्णतेच्या धोक्यापासून मुक्त आहेत; परंतु इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते कमी आहे. अभ्यासानुसार, देशात ’खूप उष्ण’ दिवसांची संख्या वाढत आहे, परंतु चिंताजनक बाब म्हणजे अतिशय उष्ण रात्रींची संख्या देखील आणखी वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य धोके निर्माण होत आहेत.

उत्तर भारतात आर्द्रता वाढली

अभ्यासात असेही आढळून आले आहे, की गेल्या काही वर्षात उत्तर भारतात उन्हाळ्यातील आर्द्रता ३० ते ४० टक्क्यांवरून ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ज्यामुळे उष्णतेचा ताण वाढला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की बाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, वृद्ध, मुले आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या असलेल्या नागरिकांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, १९९८ ते २०१७ दरम्यान, उष्णतेच्या लाटांमुळे एक लाख ६६ 
हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.
 
२०१० नंतर भारतात उष्णतेच्या लाटेचे प्रमाण सर्वाधिक झाले आहे. गेल्या वर्षी उष्माघाताचे ४८ हजारांहून अधिक रुग्ण आणि उष्णतेशी संबंधित १५९ मृत्यूंची नोंद झाली. भारतात उष्णतेमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हिमालयीन प्रदेशात उष्णता वाढली

अभ्यासातून असे दिसून आले आहे, की पारंपरिकपणे थंड असलेल्या हिमालयीन प्रदेशात, जिथे उष्णतेचे प्रमाण मैदानी आणि किनारपट्टीपेक्षा कमी आहे, तिथे देखील खूप उष्ण दिवस आणि खूप उष्ण रात्रींमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम पर्वतीय परिसंस्थेवर गंभीरपणे होऊ शकतो. उदाहरणार्थ, जम्मू -काश्मीर आणि लडाख सारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये खूप उष्ण दिवस आणि खूप उष्ण रात्रींची संख्या वाढली आहे.

रात्रीच्या वेळी तपमान वाढणे धोकादायक 

रात्रीच्या वेळी तपमान वाढणे धोकादायक मानले जाते कारण शरीराला थंड होण्याची संधी मिळत नाही. शहरी उष्णतेमुळे रात्रीच्या तपमानात वाढ अधिक सामान्य आहे. महानगरीय क्षेत्रे त्यांच्या सभोवतालच्या क्षेत्रांपेक्षा लक्षणीयरीत्या उष्ण असतात. जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये खूप उष्ण रात्रींमध्ये वाढ सर्वाधिक होती, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या दशकात, मुंबईत प्रत्येक उन्हाळ्यात १५ अतिरिक्त अतिउष्ण रात्री पाहिल्या, त्यानंतर बेंगळुरू (११), भोपाळ आणि जयपूर (प्रत्येकी ७), दिल्ली (६) आणि चेन्नई (४) उष्ण रात्री होत्या.
 

Related Articles